मुंबई : ‘व्हॅलेंटाईन डे’ सप्ताह सुरु झाला आहे. या आठवड्यातील प्रत्येक दिवस हा अनोख्या पद्धतीने साजरा केला जात असतो. अखेर 14 फेब्रुवारीला अनेकजण ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करतात. मात्र यंदाच्या वर्षीपासून भारतीय प्राणी कल्याण मंडळाने लोकांना या दिवशी अनोखे आवाहन केले आहे. 14 फेब्रुवारी रोजी Valentine Day ऐवजी गाय आलिंगन दिवस साजरा करा म्हणजेच गायीला मिठी मारून हा दिवस साजरा करा, असे म्हंटले आहे.
भारतीय प्राणी कल्याण मंडळाने आपल्या पत्रात लिहिले आहे की, आपल्या सर्वांना माहित आहे की गाय भारतीय संस्कृतीचा आधार आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली संस्कृती आणि वारसा विसरला आहे. गायीला मिठी मारल्याने भावनिक उन्नती होते. म्हणूनच गाईवर प्रेम करणाऱ्या लोकांनी 14 फेब्रुवारीला गाय आलिंगन दिवस (Cow Hug Day) साजरा करावा. हा दिवस साजरा करताना गायीला आपली माता समजा, असेही ते म्हणाले आहे.
पत्रात नेमकं काय?
गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, ती जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. मानवतेला सर्वस्व देणार्या मातेप्रमाणे पोषण देणार्या स्वभावामुळे ती कामधेनू आणि गौमाता म्हणून ओळखली जाते असे भारतीय प्राणी कल्याण मंडळाने म्हटले आहे. पशुसंवर्धन आणि डेअरी, मासेमारी मंत्रालयाच्या परवानगीनंतर आवाहनपत्रक जारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. एस. के. दत्ता यांनी हे पत्रक जारी केलं आहे.
जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केले Cow Hug Day चे पत्रक जारी होताच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या संदर्भात ट्विट केलं आहे. 14 फेब्रुवारी जगभरात व्हॅलेंटाइन्स डे म्हणून साजरा केला जातो. भारतात 14 फेब्रुवारीला आता गाईला मिठी मारा असा दिवस साजरा करण्याचे आदेश निघाले, असल्याचं आव्हाड म्हणाले.
