पुणे : महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board of Education) बारावीच्या परीक्षा (HSC Exam)सुरू झाल्या आहेत. बोर्डाच्या परीक्षेच्या इंग्रजी (English)विषयाच्या प्रश्नपत्रिकेत घोळ झाल्याची माहिती समोर आली. त्याचपाठोपाठ आता हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चूक झालीय. त्यामुळं विद्यार्थ्यांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागल्याचं समोर आलंय. हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत पर्यायांना चुकीचे आकडे देण्यात आल्यानं नेमकं उत्तर काय लिहावं, असा प्रश्नच विद्यार्थ्यांना पडल्याचं पाहायला मिळालं.
इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचं मंगळवारीच उघडकीस आलं होतं. तर बुधवारी हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचं समोर आलंय. दोन प्रश्नांमध्ये चुकीचे उपप्रश्न क्रमांक देण्यात आलेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी नेमका उपप्रश्न क्रमांक काय टाकायचा याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून आलं.
हिंदीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. मात्र, या शब्दांचे क्रमांक 1,2,1,2 असे देण्यात आले. हे क्रमांक 1,2,3,4 असे दाखवणे अपेक्षित होते. तर चार समानार्थी शब्द लिहिण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना 1,1,1,1 असे क्रमांक दिले आहेत. हे क्रमांक 1,2,3,4 असे असायला हवे होते.
संपूर्ण राज्यात बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होतेय. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 कर्मचारी कार्यरत आहेत. 271 भरारी पथकं संपूर्ण राज्यभरात परीक्षेदरम्यान काम करताहेत
