मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. कुणाचीही भीड भाड न ठेवता ते आपली भूमिका मांडत असतात. त्यामुळं आपल्या वक्तव्यामुळे ते कायम चर्चेत येत असतात. खरंतर नेमाडे यांनी कायम इंग्रजी माध्यमाला विरोध केला आहे. आताही एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी आपल्या याच वक्तव्याचा पुर्नउच्चार केला. इंग्रजी भाषा (English language) आणि मोबाईल या दोन गोष्टीवर सरकारनं आता कायद्याने बंदी आणावी, असं विधान त्यांनी केलं.
एका कार्यक्रमात बोलतांना नेमाडे यांना विचारण्यात आलं की, आजचा काळ हा दृश्यमाध्यमाचा अर्थात स्किनचा काळ आहे. आज प्रत्येकाचं विश्व हे स्क्रिन भोवती सामावलं. याचा आपल्यावर काय परिणाम होईल? वाचन चळवळीवर काय परिणाम होईल? या प्रश्नाला उत्तर देतांना नेमाडेंनी सांगितलं की, मोबाईलमुळे तुमच्या मेंदूतील 50-60 भागांपैकी एकच भाग काम करतो. हे अगदी तज्ञांनी देखील मान्य केलं.
आपण जेव्हा मोबाईलचा वापर करतो. तेव्हा तुमच्या मेंदुतलं एकच सेंटर काम करतं. हे फार घातक आहे. त्यामुळेच युरोपात आता मोबाईलवर बंदी आणण्याचं तिथलं सरकार ठरवत आहे. जर हे अन्य देशात होऊ शकतं, तर आपल्याला काय अडचण आहे. आपल्या इथंही मोबाईवर सरकारने कायद्याने बंदी घालावी, शेवटी सरकार कशीसाठी आहे, असं ते म्हणाले.
नेमाडे यांनी सांगिलतं की, ज्या पध्दतीने मोबाईलच्या वापरावर आता बंदी आणायची गरज आहे, तशीच इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरही बंदी आणली पाहिजे. कोरीया, चीन, जर्मनी या देशात कोणीही इंग्रजी शिकत नाही. मात्र, आपल्याकडे 40-50 टक्के लोक हे इंग्रजी शिकतात. इंग्रजी माध्यमात शिकणं हे चुक आहे, त्यामुळे मोबाईलबरोबरच इंग्रजी शिकण्यावरही सरकारने बंदी आणली पाहिजे.
