ठाणे, दि. 5 एप्रिल प्रतिनिधी (भाग्यश्री रासने) : उद्धव ठाकरे यांनी काल ठाणे येथे येऊन मला मुख्यमंत्री की गुंडमंत्री, देवेंद्र फडणवीस यांना फडतूस असे म्हटले. खरंतर सत्ता गेल्यामुळे ते आगपाखड करत आहेत. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. तसेच जनता सुज्ञ असून ते आरोपांना नाही तर कोण काम करतेय याला महत्त्व देत असते. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता उद्धव ठाकरे यांना बरोबर धडा शिकवेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी काल ठाणे येथे केलेल्या आणि आदित्य ठाकरे यांनी आज ठाणे येथील मोर्चात केलेल्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्याप्रमाणे काल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर टीका केली. तशी टीका उद्धव ठाकरे यांना उद्धट ठाकरे, उद्धवस्त ठाकरे असे देवेंद्र फडणवीस आणि मीही म्हणू शकलो असतो. पण आम्ही संयम ठेवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही बोलताना काळजी घ्यावी.
अन्यथा आम्हीही विचारू शकतो की तुम्ही मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात दोन मंत्री जेलमध्ये गेले. पण तुम्ही त्यांचा राजीनामा घेऊ शकला नाही. तुम्ही नारायण राणे यांना जेवण करत असताना अटक केली, अभिनेत्री कंगना राणावत हिचे घर तोडले, हनुमान चालीसा म्हटली म्हणून खासदार नवनीत राणा यांना अटक केली. हे सर्व काय आहे. तुम्ही ही गुंडगिरीच केली ना, त्यामुळे आम्हाला गुंडगिरी, आणि नैतिकता तुम्ही शिकवू नका, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
