Oplus_16908288
पंढरपूर, दि. 6 जुलै 2025 (प्रतिनिधी-चित्रलेखा रासने) : पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त लाखो वैष्णव भक्तांच्या उपस्थितीने शहर भक्तिमय रंगात न्हालं. विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे 20 लाख वारकऱ्यांनी ‘विठू माऊली’च्या जयघोषात पंढरपूर नगरी दुमदुमवली. सतत कोसळणाऱ्या आषाढधारांत भिजूनही भक्तांची श्रद्धा अधिकच प्रकट झाली.
या पवित्र दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि कन्या दिविजासह विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे कैलास दामू उगले आणि कल्पना कैलास उगले हे दांपत्य मानाचे वारकरी म्हणून गौरविण्यात आले. गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने वारी करणाऱ्या या उगले दांपत्याचा सन्मान मुख्यमंत्री दाम्पत्याच्या हस्ते शाल आणि विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती देऊन करण्यात आला.
राज्याच्या प्रगतीसाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली.आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्य मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारीच पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. पूजनानंतर मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील शेतकरी, मेहनतकऱ्यांचं जीवन समृद्ध होवो आणि महाराष्ट्र सर्व क्षेत्रांत प्रगतीपथावर जावो, यासाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली.
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, लाखो भाविक दरवर्षी वारीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये दाखल होतात. त्यांच्या अडचणींचा विचार करून 2018 पासून “निर्मल वारी” उपक्रम सुरु करण्यात आला. पालखी थांब्यांवर स्वच्छतागृह आणि अन्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत ‘चरणसेवा’ उपक्रमाद्वारे वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पंढरपूर कॉरिडोर प्रकल्पाबाबत सर्व घटकांशी संवाद साधून निर्णय घेतला जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.
शेगावमध्येही भाविकांची मोठी गर्दी विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावमध्येही आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भक्तांनी गर्दी केली. संत गजानन महाराज समाधी मंदिरात आज सकाळ पासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असून, हजारो भक्त दर्शनासाठी आले आहेत
