Oplus_16908288
मुंबई, दि. 27 जुलै 2025 (प्रतिनिधी-चित्रलेखा रासने) : संसदरत्न पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा दबदबा असल्याचं दिसून आलं. दिल्ली येथे शनिवारी पार पडलेल्या संसदरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात यंदा महाराष्ट्राच्या खासदारांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. देशभरातील एकूण 17 विजेत्यांपैकी तब्बल 7 खासदार महाराष्ट्राचे (Politics) आहेत. त्यांनी संसदेत केलेल्या सक्रिय आणि प्रभावी कामगिरीसाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवला आहे.
या कार्यक्रमात संसदीय कामकाजमंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आलं. याशिवाय, चार खासदारांना विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्रातील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनाही त्यांच्या संसदीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आलं असून, हे विशेष लक्षवेधी ठरलं.
2010 साली प्राइम पॉइंट फाउंडेशनच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या पुरस्काराचा मुख्य उद्देश म्हणजे संसदेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकशाही मूल्यांना बळकटी देणाऱ्या लोकप्रतिनिधींना प्रोत्साहन देणे. खासदारांच्या उपस्थिती, चर्चेत सहभाग, प्रश्न विचारण्याची तत्परता आणि कायदेविषयक कार्यक्षमता या निकषांच्या आधारे विजेते निवडले जातात. या वर्षासाठीची निवड राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने केली.
यंदाच्या संसदरत्न पुरस्कारप्राप्त खासदारांमध्ये महाराष्ट्रातील विविध पक्षांचे प्रतिनिधी सामील आहेत:
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)
अरविंद सावंत (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
मेधा कुलकर्णी (भाजप)
नरेश म्हस्के (शिवसेना)
वर्षा गायकवाड (काँग्रेस)
श्रीरंग अप्पा बारणे (शिवसेना)
स्मिता उदय वाघ (भाजप)
याशिवाय, भाजपचे रवी किशन, प्रवीण पटेल, विद्युत बरन महातो, आणि दिलीप सैकिया या खासदारांनाही संसदेत त्यांच्या कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलं.
उत्कृष्ट समिती गटातही निवड झाली आहे. ओडिशाच्या खासदार भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालील वित्त स्थायी समिती, आणि पंजाबचे डॉ. चरणजित सिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखालील कृषी स्थायी समिती यांना त्यांचं कायदेविषयक आणि अहवाल निर्मितीत दिलेलं योगदान लक्षात घेऊन गौरवण्यात आलं. कमीत कमी तीन वेळा खासदार म्हणून संसदेमध्ये सातत्यपूर्ण व महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या चार खासदारांना विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आले.
सुप्रिया सुळे (महाराष्ट्र)
श्रीरंग बारणे (महाराष्ट्र)
भर्तृहरी महताब (ओडिशा – भाजप)
एन. के. प्रेमचंद्रन (केरळ – क्रांतिकारी समाजवादी पक्ष)
संसदेत प्रथमच निवडून आलेल्या भाजपच्या मेधा कुलकर्णी यांचा पुरस्कारानंतरचा क्षण खास ठरला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आल्यावर त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन पुरस्कार त्यांच्या चरणी अर्पण केला. आपल्या भावना व्यक्त करताना कुलकर्णी म्हणाल्या, “हा सन्मान माझ्यासारख्या नवख्या खासदाराच्या संसदेमधील लोकहिताच्या प्रयत्नांना दिलेली मान्यता आहे. लोकप्रतिनिधीची खरी ओळख त्याच्या कृतीतून ठरते. मी यापुढेही लोकांच्या अपेक्षांचे प्रखर आणि परखड प्रतिनिधित्व करत राहीन.
