झिम्बाब्वे, हरारे दि. 6 फेब्रुवारी 2026 : अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर टीम इंडियाने नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवला आणि जेतेपद मिळवलं. पण असं असूनही टीम इंडियाला बक्षिसाची रक्कम मिळणार नाही. त्याला कारणही तसंच आहे.
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. हा सामना एकतर्फी झाला. पहिल्या डावातच या सामन्याचं चित्र स्पष्ट झालं होतं. भारताने सहाव्यांदा अंडर 19 वर्ल्डकप जिंकला आहे. आतापर्यंत सर्वाधिक वेळा जेतेपद जिंकणारा संघ ठरला आहे.
टीम इंडियाने जेतेपद मिळवलं असलं तरी आयसीसीकडून टीम इंडियाला बक्षिसाच्या रूपाने कोणतीही रक्कम मिळणार नाही. कारण आयसीसी अंडर 19 मेन्स क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रक्कम देत नाही. ही एक कौशल्य विकास करणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेचा हेतू फक्त खेळाडू घडवणे आणि विकास इतकाच आहे. मागच्या कोणत्याही पर्वात बक्षिसी रक्कम दिलेली नाही.
टीम इंडियाच्या खेळाडूंना आयसीसीकडून बक्षिसी रक्कम मिळाली नसली तर बीसीसीआय असं करत नाही. जेतेपदानंतर बीसीसीआय काही ना काही रक्कम देते. त्यामुळे यंदाही खेळाडूंना बीसीसीआयकडून रक्कम मिळणार यात काही शंका नाही.
अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2024 स्पर्धेत बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला 30 लाखांची रक्कम दिली होती. तसेच अंडर 19 टी20 वुमन्स वर्ल्डकप संघाला 5 कोटी दिले होते. त्यामुळे बीसीसीआय या वेळेसही रक्कम देईल यात काही शंका नाही.
