मुंबई, दि.२३ : राज्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पर्वत परिसरांमध्ये होणाऱ्या विकासकामांबाबत शासन गंभीर आहे. अशा ठिकाणांच्या जतनासोबतच स्थानिक नागरिकांच्या भावनांचा आदर राखत शासनाच्या नियमांप्रमाणेच पुढील कार्यवाही केली जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना स्पष्ट केले. याबाबत सदस्य महेश बालदी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री नाईक म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील उरण, मौजे चाणजे येथील द्रोणागिरी पर्वत भागाला ऐतिहासिक महत्व आहे. त्या ठिकाणी विशेष भावनिक व धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे अशा भागांमध्ये विकासकाम करताना नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. केंद्र सरकार तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार १०० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या डोंगरांवर कोणतेही व्यवसायिक, निवासी किंवा इतर विकासकाम करण्यापूर्वी सखोल तपासणी केली जाते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
