पुणे : बंडखोरीनंतर शिवसेनेने तीन वेगवेगळे प्रकल्प सुरु केले होते. त्यात एक फक्त शेतकऱ्यांशी संवाद आणि भेटीगाठी हा प्रोजेक्ट अंबादास दानवे चालवत आहेत. आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा हा प्रोजेक्ट चालवत आहेत. याच्या माध्यमातून ते राज्यभरातील युवकांना भेटत आहेत आणि राज्यभरातील चळवळीतील लोक जोडण्यासाठी मी महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून काम करत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे महाप्रबोधन यात्रेत दिसत नाहीत, असे म्हणून गैरसमज निर्माण करण्याच्या विरोधकांचा प्रयत्न आहे. असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं.
“शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांना महाप्रबोधन यात्रेची संकल्पना सांगितली होती आणि यासाठी राज्यभर मला फ्री हॅन्ड द्यावा असं सांगितलं होत. उद्धव ठाकरे यांनी मला यासाठी परवानगी दिली” असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या. महाप्रबोधन यात्रेची जी संकल्पना आहे त्यानुसार यात्रा ज्या जिल्ह्यात जाते, त्याठिकाणचे नेते याच स्वागत करतात आणि त्यात सहभागीही होतात.
- विरोधकांनी उद्धव ठाकरे यांचा आदर्श घेतला पाहिजे
एखाद्या पक्षाचा असा महत्वाचा प्रकल्प एखाद्या महिलेच्या हाती देणं, उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाचा आदर्श विरोधी पक्षांनी घेतला पाहिजे. यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. असं मत सुषमा अंधारे यांनी या मुलाखतीमध्ये मांडलं.
याच मुद्द्यावर पुढे बोलताना त्या म्हणाल्या की भारतीय जनता पार्टी हि पितृसत्ताक समाजाची वाहक आहे. त्यामुळे ते महिलांच्या हातामध्ये दोऱ्या दयायला तयार नाहीत. ज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एकही महिला नाही, त्यांना हे कसं सहन होईल अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.
