मुंबई : विधिमंडळ अधिवेशनात (Assembly Budget) आज मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे संतापलेले विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला होता. मंत्री व्हायला पुढे असता मग सभागृहात का उपस्थित राहत नाहीत. मंत्र्यांना कामकाजात कोणताच रस नाही. विधिमंडळाची गरिमा राखण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. संसदीय कार्यमंत्री तर कायमच गैरहजर असतात, त्यांना जमत नसेल तर त्यांनी पद सोडावे, असा घणाघात पवार यांनी केला.
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. अशा वेळी प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सत्ताधारी गटातील मंत्र्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. मात्र मंत्री उपस्थित राहत नसल्याने अजित पवार यांनी सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले, की सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदस्य विविध आयुधांचा वापर करुन सभागृहात आपले प्रश्न मांडत असतात. मात्र सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे आज पुन्हा सहा पैकी केवळ एका लक्षवेधीवर सभागृहात चर्चा झाली. इतर लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली.
मंत्री व्हायला पुढे-पुढे करता मग सभागृहात का उपस्थित रहात नाही ?, असा सवाल करुन मंत्र्यांना विधिमंडळाच्या कामकाजात कोणताच रस नाही, विधिमंडळाची गरीमा राखण्यात सत्ताधारी अपयशी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. संसदीय कार्यमंत्री तर सभागृहात कायमच अनुपस्थित असतात. त्यांना जमत नसेल तर त्यांनी पद सोडावे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्यासाठी हे अधिवेशन अत्यंत महत्वाचे आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी विधीमंडळ सभागृह व्यवस्थित चालण्यासाठी विरोधी पक्ष सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सभागृहाची प्रथा, परंपरा मोडण्याचे काम सत्ताधाऱ्यांच्याकडून होत आहे. सदस्य विविध आयुधांचा वापर करुन सभागृहात प्रश्न मांडत असतात, मात्र त्याला उत्तर देण्यासाठी मंत्री सभागृहात उपस्थित राहतच नाहीत. हे वारंवार घडत आहे. त्यामुळे लक्षवेधी सूचना वारंवार पुढे ढकल्याची नामुष्की सभागृहावर येत आहे.
हे सभागृह योग्य प्रकारे चालविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते संसदीय कार्यमंत्री स्वत: अनेकवेळा सभागृहात गैरहजर असतात. सभागृहाचे कामकाज करण्यासाठी समन्वय साधण्यात ते कमी पडत आहेत. त्यांना जमत नसेल तर त्यांनी पद खाली केले पाहिजे. मंत्रीपद मिळविण्यासाठी अनेक जण लॉबिंग करतात, पुढे-पुढे करतात मग सभागृहात कामकाजाच्यावेळी हे मंत्री अनुपस्थित का राहतात?
मंत्र्यांना विधिमंडळात काम करण्यात कोणताही रस नाही, त्यांचा वेगळाच उद्योग सुरु असतो. तसेच सभागृहात अश्वासीत केलेल्या सर्व बैठका सुद्धा होत नाहीत, तरी त्या बैठका सुद्धा घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.
फडणवीस यांची दिलगिरी या प्रकारानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, आम्ही मंत्र्यांना समज देऊ, असे म्हणत फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली.
