मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांनी जसे भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले तसेच आपल्या सुमधुर स्वरांनी रासिंकांच्या मनावर आशा भोसले यांनीही राज्य केले आहे. लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच आशा भोसले देखील शतकात एकाच निर्माण होतात, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गेटवे ऑफ इंडिया येथे गौरविण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आशाताई यांनी २० भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत. ‘गेटवे ऑफ इंडिया’ या चित्रपटात आशा भोसले या कोरसमध्ये गायल्या होत्या. आज त्यांचा महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान देखील ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे होत आहे. आशाताई यांचा प्रवास थक्क करणारा आहे. अभिजात आणि वर्सटाईल गायकीचा संगम म्हणजे आशाताई भोसले आहेत. त्यांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी धन्य झालो आहोत.
५० वर्षातील तरुण पिढीच्या आवडत्या गायकीचा सागर या आशाताई आहेत. त्यांचा आवाज कायम गुंजत असतो. तसेच एका दिवसात सात गाणी गाण्याचा विक्रम आशा भोसले यांच्या नावावर आहे. ज्येष्ठ गीतकार गुलजार यांची कतरा कतरा ही रचना तर आशा भोसले यांनी एका वेगळ्या उंचीवर नेली आहे. लता मंगेशकर जशा शतकात एकच होत्या. अगदी तशाच आशाताई देखील शतकात एकच आहेत, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
