मुंबई : सत्तेची खुर्ची मिळवणं एकवेळ सोपं असते. परंतु, लहानथोरांच्या मनावर अधिराज्य गाजवणे ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी अगदी सोपं करून दाखवलं आहे. आशाताईंनी १२ हजारहुन अधिक गाणी गायलेली आहेत. आज आशाताईंचा सन्मान करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्याचे सार्थक झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा भोसले यांच्या विषयी गौरवोद्गार काढले.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गेटवे ऑफ इंडिया येथे गौरविण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज आशाताई यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार स्वीकारून एकप्रकारे या पुरस्काराची उंची वाढवली आहे. त्यांनी मागील ५० वर्षे केवळ महाराष्ट्र, भारतातच नाही तर जगभरातील लहानथोर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळेच मी म्हटलो की, एकवेळ सत्तेची खुर्ची मिळवणं सोपं आहे. परंतु, लहानथोरांच्या मनावर अधिराज्य गाजवणे कठीण काम आहे. मात्र, आशाताई यांनी ते लिलया पेलले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाणं फार आवडतं. ते बऱ्याच वेळा गाणं गुणगुणत आसतात. आशाताई या कायम एंनर्जेंटिक असतात. त्यांचं ‘नाच रे मोरा नाच’ हे गाणं कायम चिरतरुण राहिल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याप्रसंगी म्हणाले.
