मुंबई, दि. 23 सप्टेंबर 2025 (प्रतिनिधी-चित्रलेखा रासने) : गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र अद्याप देखील पावसाची संततधार थांबण्याचं नाव घेत नाही आहे. यामध्ये आता हवामान खात्याने पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिक आणखी धास्तावले आहेत.
बंगालच्या उपसागरामध्ये 24 सप्टेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रात 28 सप्टेंबर पर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान राहून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
यामध्ये 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः पाऊस दुपारनंतर अधिक प्रमाणात पडेल. तर काही जिल्ह्यांमध्ये तो हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल तर 26 सप्टेंबरपासून कमी गावाच्या पट्ट्याचा प्रभाव संपूर्ण राज्यभर दिसेल.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागासह प्रशासनाने राज्यातील कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या भागातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान गेले पंधरा दिवस झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिन झाला असून द्राक्ष, सोयाबीन, कापूस, उडीद, तुर या सर्व पिकांना मोठा फटका बसला आहे
