मुबंई 3 नोव्हेंबर 2025 (प्रतिनिधी-चित्रलेखा रासने) :
महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. मुंबईतील डी. वाय. पाटील या मैदानावर होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली तर बीसीसीआय विश्वचषक जिंकल्यानंतर महिला संघाला करोडो रुपयांची बक्षिसे देऊ शकते.
भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे आणि आता इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. जर आजच्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली तर भारतीय महिला संघ 52 वर्षांमध्ये पहिल्यादाच विश्वचषक आपल्या नावावर करणार. तर दुसरीकडे बीसीसीआय (BCCI) माजी सचिव आणि आयसीसी विद्यमान अध्यक्ष जय शाह यांच्या “समान वेतन” धोरणामुळे प्रेरित होऊन, उच्च अधिकारी महिला संघाला गेल्या वर्षी टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाला मिळालेल्या बक्षीस रकमेइतकीच बक्षीस रक्कम देण्याचा विचार करत आहेत असे मानले जाते.
भारतीय पुरुष संघाने टी20 विश्वचषक अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले, त्यानंतर खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी एकूण 125 कोटी रुपये बक्षीस देण्यात आले. याचा अर्थ असा की महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास त्यांना बक्षीस रकमेमध्ये पूर्ण 125 कोटी देखील मिळू शकतात.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला विश्वचषक 2025 चा अंतिम सामना रविवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. सामना दुपारी 3:00 वाजता सुरू होईल आणि टॉस 2:30 वाजता होईल. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आणि दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 125 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.
ग्रुप लीग सामन्यात भारतीय संघाची कामगिरी सातत्यपूर्ण नव्हती, तर आफ्रिकन संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. दक्षिण आफ्रिकेने 7 पैकी फक्त 2 सामने गमावले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील साखळी सामनाही चुरशीचा होता. त्यावेळी भारत जिंकेल असे वाटत होते, परंतु नॅडिन डी क्लार्कच्या स्फोटक नाबाद 84 धावांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला तीन विकेट्सने विजय मिळवला होता.
