ठाणे ,दि.27 :कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती जगामध्ये अनेक देशांमध्ये आढळून आली आहे. जिल्हयात या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 25 डिसेंबर 2021 पासून पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत.जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी हे आदेश लागू केले आहेत.
1) विवाह सोहळ्यांना कोणत्याही प्रकारच्या बंदिस्त सभागृहांमध्ये एका वेळी 100 पेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहता येणार नाही. तसेच खुल्या मैदानांत 250 लोक किंवा क्षमतेच्या 25 % उपस्थितिची अट राहील.
2 ) इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मेळाव्यांत बंदिस्त सभागृहामध्ये एका वेळी 100 पेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहता येणार नाही. तसेच खुल्या मैदानांत 250 लोक किंवा क्षमतेच्या 25 % उपस्थितीची अट राहील.
3) इतर कार्यक्रमांच्या बाबतीत बंदिस्त सभागृहात क्षमतेच्या 50 % तर खुल्या मैदानात क्षमतेच्या 25 % पेक्षा जास्त नसावी. क्रीडा स्पर्धांसाठी क्षमतेच्या 25 % प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी राहिल.
4) इतर कोणत्याही संमेलनासाठी/ मेळाव्यांसाठी 250 लोक किंवा क्षमतेच्या 25 % लोकांना उपस्थित राहता येईल.
5) उपहार गृहे, चित्रपट व नाट्यगृहे, व्यायाम शाळा यामध्ये सध्या लागू असलेली आसन क्षमतेच्या 50% उपस्थितिची अट यापुढेही कायम राहिल. उपहारगृह मालकांना एकूण आसन क्षमतेविषयी माहिती ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक राहील.
6) सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री 09.00 ते सकाळी 06 .00 वाजेपर्यंत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी असेल.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,2005 मधील कलम 51 ते 60 भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897 व भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 188 नुसार दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर व आयुक्त श्री. सिंह यांनी कळविले आहे.

