*
मुंबई : 27 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे
शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं या पावसामुळं वाया गेलीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं लक्ष वेधण्यासाठी आज विविध शेतकरी संघटनांनी सोशल मीडियावर ऑनलाईन ट्रेंड मोहीम राबवण्याची घोषणा केलीय. शेतीच्या नुकसानानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय. सरकारकडून अजूनही मदतीची घोषणा झालेली नाही.
त्यामुळं आज सोशल मीडियावर मोहीम चालवून या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधलं जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची मुलं, बुद्धिजीवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय. किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विविध संघटनांनी या मोहिमेला सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे.
परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं. शेतकऱ्यांना या संकटात दिलासा देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारनं पुरेशा उपाययोजना केलेल्या नाहीत. सरकारने या संकट काळात पुरेशा उपाययोजना कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रांनी आज (27 ऑक्टोबर) ऑनलाईन ट्रेंड आयोजित केला आहे.
ओला दुष्काळ व त्या संबंधीच्या मागण्यांची पोस्टर्स व पोस्ट आज सकाळी 11 ते रात्री 11 या काळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करून समाजात या प्रश्नांबाबत जागृती निर्माण करणे, सरकारला या बाबतच्या मागण्या मान्य करायला भाग पाडणे असा या ऑनलाईन ट्रेंडचा उद्देश आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, खरीपाचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये मदत करावी व अग्रीमसह शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी या मागण्या ऑनलाईन ट्रेंडच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. विविध शेतकरी संघटना, शेतमजूर व कामगार संघटना, विद्यार्थी, युवक व महिला संघटना या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.
