मुंबई, दि. 16 नोव्हेंबर(प्रतिनिधी) : मुंबईत गोवरच्या रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत असताना आतापर्यंत गोवर झाल्याचा संशय असलेल्या ७ मुलांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत ६६ बालकांना पुरळ आणि ताप आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. तसेच ८३ रुग्ण दाखल करण्याची क्षमता असलेले ३ वॉर्ड आणि ५ व्हेंटिलेटरची व्यवस्था कस्तुरबा रुग्णालयात करण्यात आली आहे.
या सातही मुलांचा वैद्यकीय अहवाल विश्लेषणासाठी मृत्यू तथ्य शोधन समितीतील तज्ज्ञांकडे पाठविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ५ मुलांना उपचारांसाठी ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. मंगळवारपर्यंत गोवरच्या १४२ रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.
शिवाजीनगर आरोग्य सेवा केंद्र येथे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. गंभीर रुग्णांसाठी राजावाडी, शताब्दी आणि गोवंडी रुग्णालय येथे उपचार दिले जाणार आहेत. शहरात २० हजार मुलांचे लसीकरण झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
