वर्धा, दि. 5 फेब्रुवारी (प्रतिनिधी) : वर्धा शहरात 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) सुरूवात झाली आहे. यावेळी ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाला सुरूवात झाली. मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच गुरुदेव सेवा मंडळानी हरिपाठ आणि लेझीमचे पथक सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ विचारवंत-लेखक न्या. नरेंद्र चपळगावकर यंदा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवतील. मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्याकडून ते अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्याचबरोबर या साहित्य संमेलनासाठी वर्ध्यात येणाऱ्या पाहुण्यांचं देखील खास स्वागत करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनासाठी उद्घाटन आणि समारोपाला येणाऱ्या पाहुण्यांचं प्रत्यक्ष सूत कताई करणारा चरखा देऊन स्वागत केले जाणार आहे.
राष्ट्रपिता महत्मा गांधी यांच्या साहित्यनगरीमध्ये वर्धा शहरात यंदाच्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या साहित्य संमेलनाचं आयोजन स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणात करण्यात आली आहे
